Skip to content Skip to sidebar Skip to footer

जगात भारी आमची यारी!

मैत्री म्हणजे जरी रक्ताचं नातं नसेल तरी त्या नात्यात एक वेगळीच जादू, वेगळंच फिलिंग असतं आणि म्हणूनच मालिकेतील नायक आणि नायिकेला मित्र मैत्रीण दाखवले नसतील तर नवलंच… कारण मालिकेतील प्रेमकथा फुलवण्यात त्याच प्रमाणे कथानकात अनपेक्षित वळण आलं तर नायिका किंवा नायकाला धीर देण्यात हीच मंडळी पुढे असतात.

झी मराठीवरील पाहिले न मी तुला मधील अनिकेतचा मित्र चैत्या म्हणजे अनिकेतचा मोठा आधारस्तंभच आहे. अगदी अनि मनूच्या पळून जाऊन लग्न करण्यासाठी वकील शोधण्यापासून ते मंदिरातील गुरुजींना दहा मिनीटात लग्न उरका हे मनवण्यापर्यंत या पठ्ठ्याने सर्व कामं अगदी पटापट केली. एवढचं नाही तर अनि मनूच्या लग्नाची पहिली रात्र टेरेसवर साजरी करण्याच्या तयारीतही त्याने मोठा हातभार लावला. अनिकेतचा हा मित्र जरा धांदरट असला तरी अनि मनूचं नातं पुढे नेण्यात हाच पुढे सरसावला आणि अनिकेतनेही लग्न झाल्यावर मिठी मारून त्याला त्याच्या मदतीसाठी धन्यवाद दिले.

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते मधील अरुंधती घरच्या व्यापात मैत्रीचं नातं काही वर्षात विसरलीच होती पण तिच्या आयुष्यात देविका नावाच्या डॅशिंग, बिनधास्त मैत्रिणीची एंट्री झाली आणि देविकाने अरुंधतीला या घरच्या कामातून थोडं स्वतःसाठी जगायला शिकवलं. अनिरुद्धच्या अफेअरची बातमी कळल्यावर तिने अरूला मोठा धीर दिला. त्याच प्रमाणे तिला एक मस्त ट्रिप बुक करून ती भेट म्हणून दिली ज्यामुळे ती वेगळ्या वातावरणात जाईल आणि तिच्या मनावरचा ताण दूर होईल. अरूंधती देविकाची भावनिक छटा असलेली मैत्री खरंच मैत्रीची खरी व्याख्या अधोरेखीत करणारी ठरतेय यात शंका नाही.

Maza Hoshil Na
Maza Hoshil Na: सई नयनाची मैत्री

झी मराठीवरील माझा होशील ना मालिकेतील सई नयनाची मैत्री पाहतांना तर खूप मज्जा आली. नयनाचा भोळसट वेंधळा स्वभाव यामुळे सई बरेचदा संकटात सापडली खरी पण नयनाने काही वेळेस सई आदित्यची प्रेमकथा फुलवण्यासाठी त्यांना जवळ आणलं. आदित्य आणि सईचं एकमेकांवर प्रेम आहे असं कळल्यावर आपल्याला आवडणाऱ्या आदित्यला तिने जीजू म्हणत हसत स्विकारलं. कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी मधील विभा रणजितची मैत्री एक वेगळं मैत्रीचं स्वरूप दाखवून गेली. रणजितबरोबर रणजितची बायको संजीवनीचीसुद्धा ती छान मैत्रिण झाली. एका मुलाची आणि मुलीची फक्त मैत्री नसू शकते याला या मैत्रीने खोटं पाडलं पण एका मोहाच्या क्षणी दोघांचा तोल सुटला आणि नको ते घडलं. पण त्यानंतर विभाने रणजितला कुठला दोष दिला नाही तर संजीवनीचे आपण अपराधी आहोत हीच भावना तिच्या मनात आली.

अशाप्रकारे मालिकेतील नायिका आणि नायकाचे मित्र मैत्रिणी जरी फार कमी वेळा स्क्रीनवर दिसत असले तरी कथानकात रंजक वळण आणण्याचं काम ही पात्रं करत असतात. कधी कौटुंबिक कथेत ही पात्र वेगळा रंग भरतात, कधी आधाराचा खांदा होतात तर कधी यांचे संवाद प्रेक्षकांच्या मनात स्वतःच्या आयुष्यातील मित्र मैत्रिणीची आठवण करून देतात. त्यामुळे ही दुय्यम महत्त्वाची पात्र सुद्धा आता महत्त्वाची ठरत आहेत अस म्हणायला हरकत नाही.

– सिध्दी सुभाष कदम