Skip to content Skip to sidebar Skip to footer

जेव्हा भीमसेन जोशी यांना ‘या’ खतरनाक डाकूने अडवलं…

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) यांनी आपल्या गायकीने संपूर्ण जगभर आपला स्वतंत्र ठसा उलटवला होता. किराणा घराण्याची ध्वजा त्यांनी फडकवत ठेवली. त्यांच्या गाण्याचे, त्यांच्या मैफिलीचे, त्यांच्या रेकोर्डिंगचे अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. ‘भारतरत्न भीमसेन’ नावाचे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांच्या अनेक रसिकांना माहीत नसलेल्या मनोरंजक गोष्टींचा उल्लेख आहे. यातून पंडित भीमसेन जोशी यांचे मोठेपण तर अधोरेखित होतेच पण त्याचबरोबर गाण्यासोबतच त्यांनी इतर गोष्टींचा आनंद देखील किती भरभरून घेतला याचा देखील प्रत्यय येतो. ज्येष्ठ हार्मोनियम वादक अप्पा जळगावकर १९५६ सालापासून पंडितजींना हार्मोनियमची साथ करत असायचे. त्या निमित्ताने त्यांचे भारतभर दौरे होत असत. पंडितजी स्वतः गाडी ड्राईव्ह करत अखंड भारत पालथा घालत. त्यांना ड्रायव्हर कधीच लागायचा नाही. त्यांना गाडी चालवण्याचा प्रचंड शौक होता. त्यामुळे अखंड अठरा अठरा वीस वीस तास न थकता ते गाडी चालवत.

एकदा म्हैसूरच्या संगीत महोत्सवात त्यांना जायचं होतं. हा किस्सा साठच्या दशकातील आहे. पुण्याहून म्हैसूरला पोहोचायचं तर कमीत कमी दोन दिवस आधी जायला हवे कारण त्या काळातील रस्त्यांची अवस्था पाहता ते करणं गरजेचं होतं. परंतु पंडीत भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) आदल्या दिवशी सकाळी ११ वाजता पुण्याहून निघाले आणि न थकता रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता तिथे पोहोचले. सतत ड्रायव्हिंग केल्यामुळे फारसं खाणं झालं नव्हतं. प्रचंड थकवा होता. परंतु तिथे गेल्यानंतर गार पाण्याने अंघोळ त्यांनी केली. समोरचा प्रेक्षक वर्ग पाहून थकवा पळून गेला. तोंडात तंबाखूचा बार भरला आणि रंगमंचावर विराजमान होऊन चार वाजता त्यांनी गायला सुरूवात  केली. मैफिल रात्री दहा-साडेदहापर्यंत चालली. एक तास आराम केला आणि लगेच पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसले! कारण दुसऱ्या दिवशी त्यांचा तुळजापुरला गाण्याचा कार्यक्रम होता. पुन्हा रात्रभर प्रवास करून ते तुळजापुरात पोहोचले. कुठलाही ताण तणाव थकवा त्यांच्या चेहऱ्यावर आणि आवाजात दिसला नाही. श्रोते सुध्दा रात्री उशिरापर्यत त्यांची वाट पाहत होते. रात्री बारा वाजता पंडीत जी गायला बसले आणि पहाटेपर्यंत ते गात होते. मागचे बहात्तर तास ते जागेच होते!

एक किस्सा तर खूपच भन्नाट आहे. साठच्या दशकात एकदा दिल्लीला ते गाण्यासाठी गेले होते. दिल्लीची मैफल संपवून ते मुंबईकडे निघाले होते. नेहमी प्रमाणे  गाडी स्वतः पंडितजीच चालवत होते. ग्वाल्हेर आल्यानंतर एका पेट्रोल पंपावर ते पोचले.  तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. पेट्रोल पंप वाल्यांनी विचारले “तुम्ही कुठे चाललेला आहात?” तेव्हा त्यांनी सांगितले “आम्ही मुंबईकडे चाललेलो आहोत.” त्यावर पेट्रोल पंप चालकाने सांगितले,” माझे ऐका . आता पुढे कुठेही जाऊ नका. कारण पुढे चंबळच्या  खोऱ्यामध्ये खतरनाक इब्राहिम डाकू चा एरिया आहे आणि तो कुणालाही जिवंत सोडत नाही. तेव्हा आज इथेच मुक्काम करा आणि पहाटे इथून निघा.”  त्यावर भीमसेन जी  म्हणाले,” आम्ही गाणी बजावणी करणारे. आम्हाला कोण काय करणार?” गाडीतील इतर साथीदारांनी देखील त्यांचा थांबण्याचा सल्ला दिला. पण ऐकतील  ते भीमसेन जी कसे? ते म्हणाले,” चला काही होत नाही.” असे म्हणून त्यांनी गाडी मुंबईच्या दिशेने दामटली. रात्री दहा-साडेदहाला चंबळ च्या खोऱ्यात दरोडेखोरांची एक भिंतच समोर उभे राहिली. प्रत्येकाच्या हातामध्ये मोठ्या बंदुका होत्या चेहऱ्याला मफलर रुमाल बांधले होते. त्यांनी गाडी अडवली आणि डीकी उघडायला सांगितली. (Bhimsen Joshi)

==========

हे देखील वाचा : ‘अर्थ’ चित्रपटावेळी महेश भट व ‘या’ अभिनेत्रीचं झालं भांडण

==========

भीमसेनजींनी (Bhimsen Joshi) डीकी उघडली. तिथे वाद्य ठेवली कपड्यात बांधून होती. डाकूंनी  वाद्याची झिप  उघडायला सांगितली. तिथे हार्मोनियम, तबला, ढोलकी  अशी वाद्य होती. त्यावर त्या डाकूंचा मुखिया म्हणाला,” आप तो कोई गाणे बजाने वाले कलाकार लगते है.” त्यावर आप्पा जळगावकर म्हणाले,” जी हां”  त्यावर मुखिया ने  विचारलं , “कौन है गाने वाला?” तेव्हा त्यांनी पंडितजी कडे बोट दाखवून सांगितलं,” भीमसेन जोशी!” ते नाव ऐकल्यावर  त्या डाकूने  लोटांगण घातले आणि म्हणाला “ भाईसाब, गलती हो गयी. आप तो माता सरस्वती के भक्त हो.” असे म्हणून सन्मानाने त्यांनी त्यांना पाठवून दिले. भीमसेनजी ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर हसले आणि म्हणाले,” मी म्हणालो होतो ना. डाकू आम्हाला काय करणार?” भीमसेन जोशी यांचे नाव तेव्हा कॅसेट आणि रेडिओच्या रूपाने त्या डाकू पर्यंत देखील पोहोचले होते आणि त्यातूनच त्यांनी त्यांची सुटका केली!