Skip to content Skip to sidebar Skip to footer

यामुळे दिग्दर्शकाने नीतू सिंग सोबतचे सिनेमाचे कॉन्ट्रॅक्ट फाडले

अभिनेत्री नीतू सिंग बालकलाकार म्हणून चित्रपटात आली होती. बेबी सोनिया या नावाने तिने सुरज दस लाख, दो कलियां, दो दुनी चार, घर घर की कहानी, वारिस अशा अनेक चित्रपटातून बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. ‘दो कलियां’ या सिनेमात तर तिचा डबल रोल होता. नंतर सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी ती नायिका बनण्यासाठी प्रयत्न करू लागली. अनेक निर्मात्यांकडे तिने त्यासाठी ऑडिशन्स दिल्या. आर के फिल्म च्या ‘बॉबी’ या चित्रपटासाठी देखील तिने राज कपूर यांच्याकडे ऑडिशन दिली. (Neetu Singh)

परंतु राजकपूर यांनी तिला सिलेक्ट केले नाही. त्यामुळे नीतू सिंग खूप नाराज झाली होती. तिची आई राजसिंग ही देखील आपल्या मुलीसाठी निर्मात्यांकडे खेटे घालत होती. एकदा तिची भेट निर्माता दिग्दर्शक सावन कुमार यांच्याशी  झाली. तिने आपल्या मुलीचा पोर्टफोलिओ आणि फोटो त्यांच्याकडे दिला. सावन कुमार यांना नीतू सिंग बालकलाकार म्हणून माहीतच होती. त्यांनी लगेच तिला आपल्या सिनेमासाठी साइन केले. चित्रपट होता ‘हवस’ यात तिचा नायक होता अनिल धवन.

सावन कुमार यांना नीतू सिंग इतकी आवडली की,  पुढच्या तीन चित्रपटासाठी तिच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट केले. त्यासाठी मानधन म्हणून पैसे देखील या कॉन्टॅक्टमध्ये ठरवले गेले. पहिल्या चित्रपटासाठी साडेसात हजार दुसऱ्या चित्रपटासाठी पंधरा हजार  आणि तिसऱ्या चित्रपटासाठी पंचवीस हजार असे मानधन ठरले. (लक्षात घ्या हे सत्तर चे दशक होते!) ‘हवस’ या  चित्रपटाचा मुहूर्त मोठा शानदार झाला. अभिनेत्री नर्गिस हिने कॅमेऱ्यातून पहिला शॉट शूट केला तर अभिनेता धर्मेंद्र याने clap दिली. (Neetu Singh)

‘तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद’ हे रफी ने गायलेलं या सिनेमातील गाणं प्रचंड गाजलं. २ ऑगस्ट १९७४ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगला हिट झाला. पण नीतू सिंगच्या ऐवजी बिंदूची मादक अदा लोकांना खूश करून गेली. अर्थात नीतू सिंग चांगल्या प्रकारे क्लिक झाली हे नक्की. ‘हवस’ या सिनेमाला चांगलं यश मिळालं. याच काळात तिचा ‘यादों की बारात’ हा चित्रपट देखील आला होता पण यात तिची छोटी भूमिका होती. रणधीर कपूर सोबतचा ‘रिक्षावाला’ हा सिनेमा याच काळात आला. 

कराराप्रमाणे सावन कुमार यांनी त्यांच्या पुढच्या सिनेमाची आखणी सुरुवात केली. पण याच काळात नीतू सिंग हिला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळायला लागले होते. यश चोप्रांचा कभी कभी आणि  दिवार,  रवी टंडन यांचा खेल खेल में, नरेंद्र बेदी यांचा ‘ रफूचक्कर’.हे सर्व सिनेमे मोठ्या स्टार सोबतचे होते आणि  हिट होत होते. या सर्व सिनेमामुळे तिच्या डोक्यात हवा गेली आणि तिने सावन कुमार यांना त्यांच्या आगामी सिनेमा साठी  डेटस देणेच बंद केले.  (Neetu Singh)

सावन कुमार खूप नाराज झाले. त्यांनी नीतू सिंग ची रीतसर तक्रार फिल्म असोसिएशन कडे गेली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर फिल्म असोसिएशन ने निकाल सावन कुमार यांच्या बाजूने दिला. नीतू सिंगने सावन कुमार यांच्या  चित्रपटात काम केले पण मानधन मात्र मार्केट रेट प्रमाणे वाढवून घेतले. तिचे त्या काळात मानधन भरपूर वाढले होते. ती  पंधरा हजारात काम करायला तयारच  नव्हती. सावन कुमार  यांनी तिची ती अट देखील मान्य केली. १९७७  साली त्यांचा ‘ अब क्या होगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर फ्लॉप झाला. यात नीतू चा नायक शत्रुघ्न सिन्हा होता. (Neetu Singh) 

============

हे देखील वाचा : प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रेम अदिब यांचा जीवनप्रवास

===========

यानंतर सावन कुमार  त्यांच्या पुढच्या चित्रपटाच्या निर्मितीच्या कामाला  लागले. त्यावेळी मात्र नीतू सिंगने अव्वा च्या सव्वा  मानधन मागायला सुरुवात केली . अर्थात साहजिकच होते कारण ती आघाडीची अभिनेत्री बनली होती. आता मात्र  त्यामुळे वैतागून सावन कुमार  यांनी तिच्यासमोर ते कॉन्ट्रॅक्ट फाडून टाकलं आणि तिला त्यातून मुक्त केले ! नंतर या भूमिकेसाठी त्यांनी राधिका बारटक्के  या नव्या अभिनेत्रीला घेतलं आणि चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाचे नाव होतं ‘साजन बिना सुहागन’. जो १९७८ मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपर हिट ठरला.