Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार? अभिनेत्रीने दिली मोठी अपडेट 

मराठी चित्रपटसृष्टीत काही चित्रपट असे असतात, जे काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनात तितक्याच आपुलकीने जपले जातात. ‘गाढवाचं लग्न’ हा असाच एक सिनेमा. सावळा कुंभार, गंगी आणि रंभाची कथा प्रेक्षकांच्या काळजाला भिडली होती. प्रेक्षकांनी या सिनेमाला केवळ डोक्यावर घेतलं नाही, तर आजही तो सिनेमा तेवढ्याच प्रेमाने पाहिला जातो. मूळ नाटकावर आधारित असलेला ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः हृदयात साठवून ठेवला आहे. विशेष म्हणजे सिनेमातील गंगी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री राजश्री लांडगे यांना या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. इतकी, की आजही त्यांना ‘गंगी’ या नावानेच ओळखलं जातं.( Gadhvacha Lagna 2)

पण या चित्रपटानंतर त्या फारशा झळकल्या नाहीत. त्यामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता, ‘गाढवाचं लग्न 2’ येणार का?’ याच प्रश्नाचं उत्तर राजश्री लांडगे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलं आहे. Filmy Marathi KMW या यूट्यूब चॅनेलशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “सध्या आम्ही ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम करत आहोत. हा चित्रपट केव्हा येईल यावर सध्या ठोस काही सांगता येत नाही. पण आम्ही नक्कीच प्रोजेक्टवर काम करत आहोत.”

Gadhvacha Lagna 2

याशिवाय, राजश्री यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मनमोकळेपणाने सांगितलं. त्या म्हणाल्या, “सध्या माझं सगळं लक्ष माझ्या गावाकडील सामाजिक कामांकडे आहे. आदिवासी भागातील शाळांसाठी काम करत आहे. ही कामं पूर्ण केल्यानंतर माझं पूर्ण लक्ष चित्रपटाकडे असेल.”(Gadhvacha Lagna 2)

==============================

हे देखील वाचा: Parinati Movie: छोटा पडदा गाजवल्यानंतर आता Akshar Kothari झळकणार ‘परिणती’ सिनेमात!

==============================

या वेळी त्यांनी एक भावनिक आठवणही सांगितली. त्या म्हणाल्या की,   “पूर्वी माझे वडील ही कामं पाहायचे, पण आता त्यांच्या वयामुळे ही जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यामुळे मी अर्ध्यापेक्षा जास्त वेळ गावातच असते, मुंबईत फार क्वचित.” आता राजश्री लांडगे यांचं ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर केलेल विधान ऐकून अनेक चाहत्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. ज्या ‘गंगी’ने आपल्याला हसवलं, रडवलं आणि विचार करायला लावलं,  ती आता पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.