Skip to content Skip to sidebar Skip to footer

एका सिनेमातून अमिताभ बच्चनने तर दुसऱ्या सिनेमातून Dharmendra ने का एक्झिट केली?

प्रत्येक कलाकाराला इगो हा असतोच. त्यातून बऱ्याचदा काही अनपेक्षित अशा घटना घडत असतात. या इगो मुळे कलावंतांचे परस्परांतील संबंध देखील बिघडत जातात. या घटना तात्कालिक किंवा प्रासंगिक जरी असल्या तरी त्यातून दूरगामी असे परिणाम घडत असतात. सत्तरच्या दशकाच्या शेवटी दोन महत्त्वपूर्ण चित्रपट प्रदर्शित झाले होते. हे दोन्ही सिनेमे मोठ्या स्केलवर बनले होते. बिग बजेट होते. मल्टीस्टारर होते. प्रेक्षकांना या चित्रपटांचा मोठा ‘इंतजार’ होता.

या सिनेमांच्या निर्मितीची चर्चा अनेक वर्ष फिल्मी मॅगझिन मधून होत होती. पण याच चित्रपटाच्या मेकिंगच्या वेळी अशा काही घटना घडल्या की एका चित्रपटातून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एक्झिट घेतली तर दुसऱ्या चित्रपटातून ही मॅन धर्मेंद्र यांनी एक्झिट घेतली!  खरं तर ‘शोले’ या चित्रपटानंतर धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांना घेऊन हे दोन चित्रपट बनणार होते. पण अशा काही घटना घडल्या की एकेका चित्रपटातून हे दोघे बाहेर पडले. आणि  त्याच वेळी या दोघांचा आणखी एक चित्रपट निर्मिती अवस्थेत होता त्या चित्रपटाचे शूटिंग देखील खूप रेंगाळलं होतं. आणि तब्बल सात वर्षानंतर हा चित्रपट कसाबसा तयार होऊन रिलीज झाला होता!  तर या तीन चित्रपटांच्या मेकिंग च्या काळात घडलेल्या या ‘इगो ड्रामा’  मुळे एक्झिट एपिसोड झालेल्या चित्रपटांची ही गोष्ट!

15 ऑगस्ट 1975 या दिवशी ‘शोले’ प्रदर्शित झाला आणि सर्वत्र प्रचंड गाजला. यानंतर अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा भाव प्रचंड वाढला होता. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यशाची एक एक पाऊल टाकत सुपरस्टार पदावर आरूढ झाला. दिवार, त्रिशूल, डॉन मुकद्दर का सिकंदर… हे त्याचे प्रत्येक चित्रपट हे यशाचे नवे नवे  शिखर गाठणारे होते. त्यामुळे साहजिकच अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटाला असावा असं प्रत्येक निर्मात्याला वाटत होतं. निर्माता दिग्दर्शक बी आर चोप्रा यांचे चिरंजीव रवी चोप्रा यांनी हॉलीवुडचे ‘द टॉवरिंग इन्फर्नो’ आणि ‘द ब्रेक हार्टपास’ हे चित्रपट बघितले आणि या प्लॉटवर भारतात चित्रपट निर्माण करायचे ठरवले.

================================

हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

================================

ट्रेन एक्सीडेंट हा विषय त्यांनी निवडला. परंतु भारतीय प्रेक्षकांना आवडणारा तडका घेऊन हा चित्रपट बनवण्याचे त्यांनी ठरवले. कथा पटकथा त्यांनी स्वतः लिहिली. चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याच वेळी म्हणजे १९७८ साली रमेश सिप्पी  यांनी त्यांच्या नवीन ड्रीम प्रोजेक्ट ‘शान’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. या चित्रपटाची स्टार कास्ट धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार अशी होती. ‘शोले’ ची टीम बऱ्यापैकी इथे त्यांना रिपीट करायची होती. परंतु आता काळ बदलला होता. ‘शोले’ च्या वेळी धर्मेंद्र ची लोकप्रियता अमिताभ बच्चन पेक्षा जास्त होती. पण आता अमिताभ बच्चन सुपरस्टार पदावर आरूढ झाला होता. त्यामुळे ‘शान’ आणि ‘द बर्निंग ट्रेन’ या दोन्ही चित्रपटात अमिताभ बच्चनला लीड ॲक्टर ठेवून  स्क्रिप्ट लिहिली गेली. ही गोष्ट कुठेतरी धर्मेंद्रला खटकत होती.

कारण धर्मेंद्र हे अमिताभ बच्चनला दहा वर्ष सीनियर होते. असे असताना अमिताभ बच्चनच्या चित्रपटात सेकंड लीड म्हणून काम करणे त्यांना योग्य वाटत नव्हते. ‘शान’ चित्रपटाचे स्क्रिप्ट रायटर सलीम जावेद यांना धर्मेंद्र जाऊन भेटले आणि त्यांच्या लक्षात आले की ‘शान’ या चित्रपटात सर्व फोकस हा अमिताभ बच्चन यांच्यावर असणार आहे. इथेच धर्मेंद्र चे  रमेश सिप्पी  आणि सलीम जावेद सोबत क्रियेटीव्ह डीफरंस निर्माण झाले आणि धर्मेंद्र यांनी ‘शान’ चित्रपट सोडला.

धर्मेंद्रच्या पाठोपाठ या चित्रपटातून हेमामालिनी यांनी देखील एक्झिट घेतली. दुसरीकडे ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटात अशीच परिस्थिती होती. धर्मेंद्र आणि बी आर  चोप्रा यांचे खूप जुने संबंध होते. धर्मेंद्र यांनी बी आर  चोप्रा यांना आपल्याला अमिताभ बच्चन पेक्षा लीड रोल या चित्रपट मिळावा असे सांगितले. रवी चोप्रा यांना सुरुवातीला ते पटले नाही परंतु वडिलांनी आग्रह केल्यामुळे अमिताभ बच्चन यांची भूमिका थोडीशी कमी करून सर्व फोकस आता  धर्मेंद्रवर आला. ही गोष्ट जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या कानावर गेली. त्यावेळेला त्यांनी स्वतःहून या चित्रपटातून एक्झिट घेतली!  त्या काळातील इंडियन एक्स्प्रेस च्या स्क्रीन या फिल्मी साप्ताहिक आतून ही मोठी ब्रेकिंग न्यूज वाचकांना वाचायला मिळाली!

अशा पद्धतीने अमिताभ बच्चन यांनी ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटातून एक्झिट घेतली. तर ‘शान’ या चित्रपटातून धर्मेंद्र यांनी एक्झिट घेतली! ‘शान’ या चित्रपटात धर्मेंद्र ची भमिका नंतर शशी कपूर यांना देण्यात आली. तर ‘द बर्निंग ट्रेन’ मधील अमिताभ बच्चन यांची भूमिका धर्मेंद्रला तर धर्मेंद्र ची भूमिका विनोद खन्नाला देण्यात आली!  या चित्रपटात जितेंद्र यांची भूमिका ऍड झाली.  २० मार्च १९८० रोजी  ‘द बर्निंग ट्रेन’ प्रदर्शित झाला तर १२ डिसेंबर १९८०  या दिवशी ‘शान’  प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांना पहिल्या रिलीज ला फारसे यश मिळाले नाही. पण कालांतराने रिपीट रन ला या सिनेमाने चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. याच काळात विजय आनंद तथा गोल्डी  यांचा ‘राम बलराम’ हा धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांना घेऊन सुरू केलेला चित्रपट अनेक वर्षे निर्मिती अवस्थेत होता. तब्बल सात वर्षानंतर हा चित्रपट २८ नोव्हेम्बर १९८० रोजी रिलीज झाला. हा अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ठरला. यानंतर या दोघांनी आजवर तरी कुठल्या चित्रपटात एकत्र काम केले नाही!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी