
Gaurav More ने स्वतः सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचे कारण म्हणाला,’सुरुवातीला ते मजेशीर वाटत होतं, पण…’
हास्याच्या एका साध्या पंचलाइनमधून थेट प्रेक्षकांच्या मनात घर करणं ही सगळ्यांना जमत नाही. पण गौरव मोरेने ( Gaurav More) हे करून दाखवलं. सोशल मीडियावरून रंगमंचापर्यंत आणि तिथून थेट दूरदर्शनपर्यंतचा त्याचा प्रवास हा संघर्ष, संयम आणि सातत्य यांचा उत्तम नमुना ठरतो. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ ही ओळख मिळवणारा गौरव आज केवळ विनोदी कलाकार नाही, तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून मिळालेल्या अफाट लोकप्रियतेनंतर त्याने घेतलेला अनपेक्षित ब्रेक आणि त्यामागचं कारण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव हिंदीतील ‘मॅडनेस मचायेंगे’ (Madness Machayenge) या कॉमेडी शोमध्ये झळकला होता. मराठीतील यशस्वी प्रवास असताना हिंदी शो स्वीकारण्यामागचं नेमकं कारण काय, याचा खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.(Gaurav More)

‘9 माईंड क्रिएशन’ला दिलेल्या मुलाखतीत गौरव म्हणाला की, “माझ्याकडे वारंवार एकाच प्रकारच्या भूमिका यायच्या. हिरो-हिरोइन असतात, त्यांच्या आयुष्यात मी एंट्री घेतो, घरात गोंधळ होतो आणि मग कॉमेडी. सुरुवातीला ते मजेशीर वाटत होतं, पण सतत तेच करत राहिल्याने मला कंटाळा आला. त्यामुळे मी वर्षभरासाठी या सगळ्यातून ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला. त्याच काळात ‘मॅडनेस मचायेंगे’चे काही एपिसोड केले, कारण हिंदीतून मला खास बोलावणं आलं होतं. मला कॉमेडी सोडायची नव्हती, फक्त स्वतःला थोडा वेळ द्यायचा होता.” गौरवने याआधी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘हास्य सम्राट’ यांसारख्या कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला होता. मात्र, त्या काळात अभिनय आणि सादरीकरणाचा पुरेसा अनुभव नसल्याने अपेक्षित यश मिळू शकलं नाही, असं तो प्रांजळपणे मान्य करतो. त्यानंतर अनेक वर्षं तो स्थानिक कार्यक्रमांमध्ये स्टँड-अप कॉमेडी करत आपली कला घडवत राहिला.

एका मुलाखतीत आपल्या प्रवासाबद्दल बोलताना गौरव भावूक होत म्हणाला,‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने मला सगळं दिलं. पैसा, प्रसिद्धी आणि आयुष्यात स्थैर्य. आज मी देशातील महागड्या मोबाइल फोनपैकी एक वापरतो. पण दहा वर्षांपूर्वी बस किंवा ट्रेनने प्रवास करण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. आज माझ्याकडे स्वतःची कार आणि बाईक आहे. एकेकाळी पायात घालायला शूज नव्हते, आणि आज माझ्याकडे शूजचं कलेक्शन आहे.” (Gaurav More)
==================================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार तूफान राडा !
==================================
तो पुढे असही सांगतो की, “माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे काही मित्रांनी माझ्याशी संपर्क तोडला होता. पण आज तेच लोक माझ्या घरी येतात, माझ्यासोबत फोटो आणि सेल्फी काढतात.”संघर्षातून यशापर्यंतचा हा प्रवास गौरव मोरेसाठीच नाही, तर अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारा हा कलाकार आज आपल्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे वेगळी ओळख निर्माण करत आहे.