
Maharashtrachi Hasyajatra फेम Nikhil Bane चा अपघात; ‘मी त्यांचे चेहरे विसरणार नाही…’ म्हणत शेअर केला भावनिक व्हिडिओ
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra) मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने (Actor Nikhil Bane) सध्या त्याच्या युट्यूब व्लॉगसाठी खास कोकण सफरीवर आहे. ‘कोको राईड’ (Coco Ride) या सीरिजच्या निमित्ताने तो कोकण किनारपट्टीवर बाईक राईड करत असताना एक अनपेक्षित घटना घडली.कोकणातील निसर्गरम्य रस्त्यांवरून सुरू असलेला त्याने केलेला एक साधा प्रवास अचानक चर्चेचा विषय ठरला आहे. (Nikhil Bane Accident)

मंडणगड-दापोली परिसरात हिंमतगडकडे जात असताना निखिलचा अपघात झाला. उंच चढावावरून जाताना रस्ता घसरडा असल्यामुळे त्याची बाईक अचानक घसरली आणि त्याचा तोल गेला. सुदैवाने हा अपघात गंभीर नव्हता, मात्र त्याच्या हाताला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली. या प्रसंगाची माहिती स्वतः निखिलने व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी विशेष लक्षवेधी ठरली. तिथून जाणाऱ्या काही लोकांनी निखिलला उभं राहण्यास मदत केली. रस्त्यावर खारी-बटर विकणाऱ्या एका व्यक्तीनेही त्याला आधार दिला, तर गावातील महिलांनी पाणी देत त्याची विचारपूस केली. या सगळ्या अनुभवामुळे निखिल भावूक झाला आणि कोकणातील लोकांच्या साधेपणाचं आणि आपुलकीचं कौतुक केलं.

निखिल बनेने भावूक होत स्थानिकांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, “कोकणातल्या लोकांचं हेच वैशिष्ट्य आहे. मला मदत करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. त्यांची नावं मला माहिती नाहीत पण त्यांचे चेहरे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही”. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चाहत्यांनीही त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली. अनेकांनी त्याला सुरक्षित प्रवास करण्याचा सल्ला दिला. एका चाहत्यानं लिहिलंय, “राइड सेफ भावा.” दुसऱ्यानं लिहिलंय, “सांभाळून रे बाबा. बाईक चालवताना काळजी घे.” तर आणखी एकानं लिहिलंय, “काळजी घे मित्रा आणि तुझा पुढचा प्रवास सुखाचा जावो हीच हरिहरेश्वरा चरणी प्रार्थना .” (Nikhil Bane Accident)
===============================
हे देखील वाचा: Jai Jai Swami Samarth मालिकेत मोठा ट्विस्ट! अक्षय मुदवाडकर नाही आता ‘हा’ अभिनेता स्वामींच्या भूमिकेत दिसणार…
===============================
या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली की कोकण केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नाही, तर तिथल्या माणुसकीसाठीही ओळखलं जातं. अचानक आलेल्या संकटातही अनोळखी लोकांनी दिलेला आधार हा प्रत्येकाच्या मनात घर करून जाणारा अनुभव ठरतो.