
अफवांना पूर्णविराम!; अखेर Zakir Khan ने सांगितलं स्टँडअपपासून ब्रेक घेण्याचं खरं कारण…
सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खानने (Zakir Khan) गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांना एक महत्त्वाची बातमी दिली होती. तो काही काळासाठी कॉमेडीपासून दूर राहणार असल्याचे त्याने जाहीर केले होते. या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. अनेकांना प्रश्न पडला होता की, अचानक असा निर्णय का घेतला गेला? आता मात्र झाकीर खानने स्वतः एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना या ब्रेकमागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना झाकीर खानने स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्याला कॉमेडी सोडायची अजिबात इच्छा नाही. उलट कॉमेडी हीच त्याची ओळख आणि आवड असल्याचे तो म्हणाला. मात्र सततच्या कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ मिळत नसल्यामुळे त्याने काही काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. “मला थोडा वेळ विद्यार्थ्यासारखे जगायचे आहे,” असे तो म्हणाला. आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःकडे लक्ष देणे आणि काही नवीन गोष्टी शिकणे त्याला महत्त्वाचे वाटत असल्याचे त्याने सांगितले. (Zakir Khan)

झाकीर खानच्या मते, हा ब्रेक साधारणपणे दीड ते दोन वर्षांचा असू शकतो. या काळात तो आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष देणार आहे. गेल्या काही वर्षांत सततच्या शो, प्रवास आणि कामाच्या ताणामुळे स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही, असेही त्याने मान्य केले. त्यामुळे आता थोडा वेळ थांबून स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. या ब्रेकच्या काळात झाकीर खानची आणखी एक मोठी योजना आहे. तो संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा विचार करत आहे. विविध शहरांमध्ये फिरून तिथली संस्कृती, लोकांचे जीवन आणि अनुभव जवळून जाणून घेण्याची त्याची इच्छा आहे. हा प्रवास त्याच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्याच्या सर्जनशीलतेलाही नवी दिशा देईल, असा त्याचा विश्वास आहे.

झाकीर खानने कामातून ब्रेक घेतल्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या. काही रिपोर्ट्समध्ये त्याला गंभीर आजार असल्याचेही म्हटले जात होते. मात्र झाकीरने या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे. त्याने स्पष्ट केले की त्याची तब्येत फार गंभीर बिघडलेली नाही. फक्त थोडीशी प्रकृतीची अडचण असल्यामुळे आणि स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.(Zakir Khan)
===================================
===================================
याशिवाय झाकीर खानने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. गेल्या सहा वर्षांपासून त्याच्याकडे बरेच लिखाणाचे काम प्रलंबित आहे. सततच्या कार्यक्रमांमुळे त्याला ते पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या ब्रेकच्या काळात तो लेखनावरही लक्ष केंद्रित करणार आहे. झाकीर खानचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी थोडा आश्चर्याचा असला तरी अनेकांनी त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्वतःच्या आरोग्याला आणि वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, याचा संदेशही त्यातून मिळत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.