
Simple Kapadia : अयशस्वी अभिनेत्री पण यशस्वी कॉस्ट्यूम डिझायनर!
निर्माता दिग्दर्शक शक्ती सामंत १९७७ साली एक चित्रपट बनवत होते ‘अनुराग’. या सिनेमाचा नायक होता सुपरस्टार राजेश खन्ना आणि नायिका होती तीन वर्षांपूर्वी सुपरहिट झालेल्या ‘बॉबी’ या चित्रपटाची नायिका डिंपल कपाडिया ची धाकटी बहीण सिम्पल कपाडिया. ‘बॉबी’ चित्रपट सेटवर असतानाच सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न झाले होते आणि तिने चित्रपट संन्यास घेतला होता. एकच सिनेमा सुपरहिट करून ती सिनेमाच्या दुनियेपासून बाहेर झाली होती. त्यामुळे पडद्यावरील राजेश खन्ना – डिंपल कपाडिया रोमान्स प्रेक्षकांना पाहता आला नाही. पण १९७७ साली येणाऱ्या ‘अनुरोध’ या चित्रपटाची जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली होती.

कारण डिंपलची बहीण सिम्पल पडद्यावर सुपरस्टार राजेश खन्ना सोबत येत आहे, अशी मोठी जाहिरात त्या काळात होत होती. त्यामुळे सिनेमा रिलीज होण्यापूर्वी या सिनेमाची प्रचंड हवा निर्माण झाली होती. चित्रपट होता ‘अनुरोध’. या चित्रपटातील गाणी सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच गाजली होती. पण सिनेमाला व्यावसायिक यश मिळाले नाही. याचे कारण असे होते की जरी या सिनेमाची प्रचंड हवा निर्माण झालली होती तरी ‘ डिंपल’; ‘डिंपल’ होती. आणि ‘बॉबी’; ‘बॉबी’ होता. सिम्पल कपाडियाची कायम डिंपलशी तुलना केल्यामुळे तिचा स्ट्रगल आणखी वाढला. प्रेक्षकांना ‘बॉबी’ सारखे सेन्सेशन पाहायला मिळेल असे वाटले पण सिम्पल तिथेच कमी पडली आणि चित्रपट फ्लॉप झाला. या सिनेमातील जिजा सालीचा रोमान्स प्रेक्षकांना आवडला नाही.
त्या काळात टीव्ही नव्हता, ओटीटी नव्हते त्यामुळे सिनेमा हाच एकमेव पर्याय समोर होता. सिंपल चा हा चित्रपट फ्लॉप झाला पण राजेश खन्ना मुळे तिला आणखी काही चित्रपट मिळाले. चक्रव्यूह , शाका , लूट मार ,जमाने को दिखाना है…. पण सिम्पल चे करिअर कधी बहरलेच नाही. देव आनंद यांच्या ‘लूटमार’ या चित्रपटातील ‘जब छाये मेरा जादू कोई बॅच न पाये..’ या गाण्यात मात्र ती मस्त नाचली होती. सिंपल ची डिंपल सोबत जर तिची तुलना केली नसती तर सिम्पल नक्कीच चालली असते असे वाटते. पण आपल्याकडे हा मोठा प्रॉब्लेम असतो.
================================
================================
ऐंशी च्या दशकाच्या सुरुवातीला राजेश खन्ना आणि डिंपल कापडिया यांच्यात मतभेद सुरू झाले. आणि डिंपल पुन्हा सिनेमाच्या दुनियेत आली. रमेश सिप्पी यांचा ‘सागर’(१९८५) सुपरहिट झाला आणि तिच्याकडे चित्रपटांची रांगच लागेली. त्यामुळे साहजिकच डिंपल च्या मुली ट्विंकल आणि रिंकी यांची जबाबदारी सिम्पल कपाडिया यांनी घेतली. या दोन्ही मुली मावशीकडे व्यवस्थित राहू लागल्या. १९८७ साली सिंपल कापडियाने अॅक्टींगला बाय-बाय करून कॉस्च्युम डिझाईनिंग मध्ये करिअर सुरू केले. डिंपल कापडियाच्या सर्व सिनेमाचे कॉस्च्युम्स ती बनवू लागली. याच काळात डिंपल आणि सनी देवल यांच्या अफेअर चालू झाले होते याचा फायदा देखील सिम्पल कपाडियाला झाला. सनी देओलने देखील तिला आपले ऑफिशियल कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून नेमले. त्या काळातील डिंपल आणि सनीच्या सर्व चित्रपटांचे कॉस्च्युम डिझाईनिंग सिम्पल कपाडिया करत होती. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला आलेल्या ‘रुदाली ‘ या चित्रपटात डिंपल कपाडियासाठी त्यांनी केलेले कॉस्च्युम्स प्रचंड गाजले आणि या कॉस्च्युम डिझायनिंग साठी तिला त्यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

१९९२ साली तिने राजिंदर शेट्टी सोबत तिने लग्न देखील केले. सिम्पलच्या आयुष्याची ट्रॅजेडीच होती. एक चांगली गोष्ट घडली की त्यासोबत दोन वाईट गोष्टी देखील घडत होत्या. कॉस्ट्यूम डिझायनिंगचे करिअर चांगले चालू असतानाच १९९९ साली तिचा घटस्फोट झाला आणि २००६ साली तिला कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यासोबत फाईट करून १० नोव्हेंबर २००९ रोजी वयाच्या अवघ्या ५१ वर्षी सिंपल कपाडियाचे निधन झाले. ‘लूटमार’ या चित्रपटात सिंपल म्हणाली होती, ‘जब छाये मेरा जादू कोई बॅच न पाये..’ पण तिच्या अभिनयाची जादू काही चालली नाही. कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून मात्र ती यशस्वी झाली. तिच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा करण याची जबाबदारी डिंपल कपाडियाने घेतली. डिंपल कपाडियाने जेव्हा सिनेमात कमबॅक केला होता, त्यावेळेला तिच्या मुलींचे जबाबदारी सिम्पल ने घेतली होती आता सिम्पल कपाडिया चे निधन झाल्यानंतर तिच्या करण या मुलाची जबाबदारी डिंपलने घेतली. अशा तऱ्हेने एक वर्तुळ पूर्ण झाले.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी