
स्टार प्रवाहवर येणाऱ्या ‘आनंदी’ मालिकेतून अभिनेते Arun Nalawade आणि Sameer Dharmadhikari मालिका विश्वात पुनरागमन!
मराठी टेलिव्हिजनवर लवकरच एक नवी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘आनंदी’ (Anandi Serial) या आगामी मालिकेने पहिल्याच प्रोमोमुळे मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. हा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि काही तासांतच त्याला दोन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. विशेष म्हणजे या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे (Arun Nalawade) आणि लोकप्रिय अभिनेता समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत.(Star Pravah Anandi Serial)

या मालिकेत अरुण नलावडे आत्माराम जाधव उर्फ आबा ही भावनिक व्यक्तिरेखा साकारत आहेत. आबा इचलकरंजी येथे आपल्या तीन नातींसोबत राहतात. त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का बसलेला असतो, कारण एका अपघातात त्यांच्या मुलीचा आणि जावयाचा मृत्यू झालेला असतो. मात्र त्या संकटातून सावरत त्यांनी नातींच्या भविष्यासाठी स्वतःला सावरलं. उतार वयातही ते कष्ट करत राहतात आणि युगंधर निंबाळकर यांच्या मिलमध्ये काम करतात. आनंदीला दृष्टी नसली तरी आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टिकोन आबांनीच तिला दिलेला असतो. तिन्ही नातींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं, हीच त्यांची सर्वात मोठी इच्छा आहे.

दुसरीकडे, मालिकेत युगंधर निंबाळकर ही भूमिका समीर धर्माधिकारी साकारत आहेत. युगंधर हा यशस्वी उद्योगपती असून त्याच्यासाठी काम सर्वात महत्त्वाचं आहे. गावात त्याचा शब्द अंतिम मानला जातो. कारण एक काळ असा होता की गावात अनेकजण बेरोजगार होते. त्या वेळी युगंधरने आपल्या मिलमध्ये गावकऱ्यांना काम देत अनेक कुटुंबांना आधार दिला. त्यामुळे गावातील लोक त्याला देवासमान मानतात. या मालिकेबद्दल बोलताना समीर धर्माधिकारी यांनी सांगितलं की स्टार प्रवाहसोबतची ही त्यांची पहिलीच मालिका आहे. जवळपास सात वर्षांनंतर ते पुन्हा मालिकेत काम करत असल्याने त्यांना खूप आनंद आणि उत्सुकता आहे. मालिकेचा विषय वेगळा असून संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभवही उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं.(Star Pravah Anandi Serial)
==============================
==============================
दरम्यान, अरुण नलावडे यांनीही या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं की तीन नातींच्या आयुष्यात आधार बनलेल्या आजोबांची भूमिका साकारणं त्यांच्यासाठी खास आहे. मालिकेतील तिन्ही तरुण अभिनेत्रींसोबत त्यांची छान मैत्री जमली असून त्या अत्यंत गुणी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत काम करताना स्वतःलाही नवीन गोष्टी शिकायला मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भावनिक नातेसंबंध, संघर्ष आणि प्रेरणा यांची गुंफण असलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ‘आनंदी’ ही नवी मालिका ३० मार्चपासून दररोज रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.