
Sharaabi : नशा शराब मे होता तो नाचती बोतल….
निर्माता दिग्दर्शक प्रकाश मेहरा ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा यांना घेऊन एक महत्त्वकांक्षी चित्रपट निर्माण करत होते ‘शराबी’ या चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली होती. तर संगीत बप्पी लहरी यांनी दिले होते. या चित्रपटातील एक गाणे गायला किशोर कुमार यांनी सुरुवातीला नकार दिला होता परंतु नंतर त्यांनी ते गाणे गायले आणि हे गाणे सुपर डुपर हिट झाले. या दशकातील किशोर कुमारच्या टॉप टेन गाण्यांमध्ये या गाण्याचा हमखास समावेश होतो. कोणते होते ते गाणे आणि किशोर कुमार यांनी गाणं गायला का नकार दिला होता? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
मुकद्दर का सिकंदर (1978) नमक हलाल (1982) यानंतर प्रकाश मेहरा यांनी ‘शराबी’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. अमिताभ बच्चन यांना ‘शराबी’ ची भूमिका देऊन त्यांनी एक जबरदस्त हिट चित्रपट बनवला. या चित्रपटात ‘इंतेहा हो गई इंतजार की..’ या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला किशोर कुमारने चक्क एक टेबल मागवला आणि त्यावर झोपून या गाण्याचे रेकॉर्डिंग केले. त्यांनी प्रकाश मेहराला सांगितले,” मी स्वतः दारू पीत नाही पण मला माहित आहे की दारू पिल्यानंतर त्या व्यक्तीची काय अवस्था होते. हे गाणे एका शराबीचे आहे. त्यामुळे मला या गाण्याचे रेकॉर्डिंग झोपून करायचे आहे. तुम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये एका टेबलाची व्यवस्था करा.“

त्याप्रमाणे निर्मात्याने तिथे टेबलाची व्यवस्था केली आणि किशोर कुमारने अक्षरशः झोपून या गाण्याचे रेकॉर्डिंग केले. या चित्रपटात आणखी एक गाणे होते जे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायले होते. गाण्याचे बोल होते ‘मुझे नवलखा मंगा दे रे ओ सैया दीवाने….’ हे गाणं तब्बल अकरा मिनिटांच होतं! प्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात असे लांबलचक मोठे गाणे असण्याचा हा तिसरा प्रसंग होता. ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातील ‘सलाम ए इश्क मेरी जान जरा कबूल कर लो’ हे लता किशोर चे गाणे, त्यानंतर ‘नमक हलाल’ या चित्रपटातील पग घुंगरू बांध मीरा नाची हे किशोरकुमार ने गायलेले प्रदीर्घ गाणे आणि यानंतर ‘शराबी’ या चित्रपटात त्याच टाईपचे हे गाणे होते जे तब्बल अकरा मिनिटांचे होते!

या गाण्याचे सुरुवात आशा भोसले यांच्या स्वरात होते. मुझे नौलखा मंगा डे रे ओ सैय्या दिवाने..’ व यानंतर किशोर कुमार यांचा पार्ट सुरू होतो गाण्याची बोल होते ‘लोग कहते है मैं शराबी हु तुमने भी शायद यही सोच लिया….’ या गाण्यांमध्य गीतकार अंजान यांनी एक ओळ लिहिली होती ‘नशा शराब मे होता तो नाचती बोतल….’ गाण्याचे बोल वाचताना किशोर कुमार या लाइन पाशी थांबला आणि अंजान यांना म्हणाला, “अंजान जी, ये लाईने आपने कहा से उठाई है ? क्या आप अपने खुद के शब्द इस्तेमाल नही कर सकते?”.
================================
================================
किशोर कुमारने असे विचारण्याचे कारण असे होते 1972 साली एक चित्रपट आला होता ‘मुनीमजी’ या चित्रपट अनिल धवन आणि योगिता बाली यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली होती. त्यात रफी यांनी गाणं गायलं होतं ‘नशा शराब मे होता तो नाचती बोतल..’ किशोर कुमार यांना वाटलं अंजान यांनी सही सही त्या ओळी उचलून या गाण्यात टाकल्या आहेत त्यामुळे त्यांनी इथे गाणं गायला नकार दिला! निर्मात्यांपुढे आता पेच निर्माण झाला. पण गीतकार अंजान यांनी किशोर कुमार, बप्पी लहरी, प्रकाश मेहरा यांना बोलवून सांगितले,” आता तुम्हाला मी सत्य सांगतो. आपण ज्या लाईन्स हसरत जायपुरी यांच्या म्हणत आहात त्या त्यांच्या देखील नाहीत. या लाईन्स आहेत शायर आरीफ जलाली यांच्या एका शेर मधील. तो शेर असा आहे
खुद अपनी मस्ती है जिस ने मचाई है हलचल
नशा शराब मे होता तो नाचती बोतल!
उर्दू शायरीमध्ये एक दुसऱ्याच्या लाईन्स घेणे हा कॉमन प्रकार आहे.” गीतकार अंजान यांचा हा खुलासा ऐकल्यानंतर वातावरण एकडाम बदलले. किशोर कुमार गायला तयार झाला आणि गाण्यांचे रेकॉर्डिंग पार पडले!
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी