
Sujata : जलते है जिसके लिये तेरी आंखो के दिये….
संगीतकार सचिन देव बर्मन आणि त्यांची पत्नी मीरा बर्मन पहिल्यांदाच लग्नानंतर दार्जिलिंगला गेले होते. साल होतं 1930. त्या काळात घरी फोन असणे ही खूप लक्झरीयस गोष्ट होती. सचिन देव बर्मन यांचे नातेवाईक रोज संध्याकाळी सचिनदा यांना फोन करून आम्हाला एक टेलिफोनवर गाणं ऐकवा असं सांगायचे. सचिनदा देखील आपल्या नातेवाईकांची ही फर्माईश पूर्ण करत असत. कधी कधी मीरा बर्मन या देखील टेलिफोनवर गात असत. हनिमूनच्या दिवसातील ही रोमँटिक आठवण सचिन देव बर्मन यांनी कायम लक्षात ठेवली. नुसते लक्षात ठेवली नाही तर त्यानंतर तब्बल तीस वर्षांनी जेव्हा विमल रॉय यांच्या एका चित्रपटाला संगीत देताना त्यानी त्यातील एका गाण्याच्या वेळेला त्यांनी ही टेलीफोन वर गाण्याची आयडीया वापरली. चित्रपट होता ‘सुजाता’.
आज हा चित्रपट एक कल्ट क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. अस्पृश्य तेचा प्रश्न खूप चांगल्या रीतीने यात हाताळला होता. अभिनेत्री नूतन यांचा या चित्रपटातील अभिनय अतिशय वरच्या श्रेणीचा होता. तिला या भूमिकेसाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाचे कथाकथ प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारे असे होते. चित्रपटाचा ब्राह्मण नायक अधीर (सुनील दत्त) पुरोगामी विचारांचा असतो त्याचे हरिजन नायिका नूतन (सुजाता) वर मनोमन प्रेम करत असतो. पण सुजाता त्या घरात एक आश्रित मुलगी म्हणून वाढवलेली असते. जेव्हा त्या घरच्यांची स्वतःची मुलगी रमा जी भूमिका शशिकला न केली आहे तिचे लग्न अधीर सोबत ठरवण्याची चर्चा चालू असते; तेव्हा सुजाता आतून हेलावून जाते. आपण या घरची मुलगी नाही. आपण आश्रित हरिजन आहोत. आपली लायकी नाही अधीर सोबत लग्न करण्याची. सुजाता आपल्या मनातील फुललेल्या प्रेमाच्या भावना मिटवून टाकते. चित्रपटात याच सिच्युएशन वर एक गाण्याची जागा असते. आणि त्याच वेळेला सचिन देव बर्मन यांनी या गाण्याची योजना केलेली असते.

बिमल रॉय यांना जेव्हा त्यांनी या गाण्याच्या बद्दल सांगितले तेव्हा हे गाणे नायक टेलिफोनवर गाऊन आपल्या भावना नायिके सोबत व्यक्त करतो असे सांगितले. तेव्हा बिमलदा यांना देखील खूप विचित्र वाटले वाटले परंतु सचिनदा यांनी आपला स्वतःचा तीस वर्षा पूर्वीचा एक्सपिरीयन्स सर्वांसमवेत शेअर केला. या मिटींगला गीतकार मजरूह सुलतानपुरी देखील उपस्थित होते. त्यांनी गीतातील भावनांना हळव्या शब्दातून मांडले. चित्रपटात एकदा अधीर आणि सुजाता नदीकिनारी गप्पा मारत असताना अधीर गुणगुणत असतो. तेव्हा सुजाता म्हणते ‘जरा जोर से गाइये ना..’ तेव्हा तो म्हणतो,” अभी तो मेरे पास सूर है. बोल नही है.” हा त्यांच्या संवादाचा धागा पकडून यांनी गीत लिहिले यात त्यानी लिहिले ‘ढूंढ लाया हूं वोही गीत मै तेरे लिए..’ जेव्हा या गाण्याचे रेकॉर्डिंगच वेळ आली या गाण्यासाठी तलत महमूद यांचा आवाज घेण्याचे ठरले.

कारण चित्रपटातील इतक्या हळव्या रोमांटिक क्षणी तितकाच नाजूक आणि हळवा स्वर हवा होता. या गाण्याचे रेकॉर्डिंग करताना सचिन देव बर्मन यांनी इंटरल्यूड मधील म्युझिक फार सुंदर दिले होते. नूतनच्या चेहऱ्यावरील भावना ज्यात प्रेमाची आस होती पण त्याच वेळी कटू वास्तवतेचा न्यूनगंड देखील होता . ही हतबलता आणि बदलणारे संगीत यांचा फार सुंदर मिलाफ या गीतात सचिनदा यांनी दाखवला होता. तिच्या मनातील भावनांचा संमिश्र कल्लोळ संगीतातून व्यक्त होतो. टेलीफोन वर इतके सुंदर गाणे पुन्हा कधीच बघायला मिळाले नाही. ‘जलते है जिसके लिए’: हे गाणे प्रेमाची व्याकुळता मांडते.
================================
हे देखील वाचा : Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना का झापले होते?
================================
बिमल रॉय हे त्यांच्या ‘रिअलिझम’ (वास्तववाद) साठी ओळखले जात. त्यांनी हा विषय अतिशय संवेदनशीलतेने हाताळला आहे. कुठेही प्रचारकी न करता, केवळ प्रतिमांच्या (Visuals) माध्यमातून त्यांनी जातिव्यवस्थेचे क्रूर वास्तव मांडले आहे. उदा. पावसाच्या दृश्यात सुजाताचे गांधीजींच्या पुतळ्यापाशी आश्रय घेणे, हे तिच्या आंतरिक संघर्षाचे प्रतीक वाटते. ब्लॅक अँड व्हाईट कालखंडातील हा चित्रपट असूनही, त्यातील प्रकाशयोजना (Lighting) आणि कॅमेरा अँगल कौतुकास्पद आहेत. सावल्यांचा वापर करून सुजाताच्या मनातील भीती आणि एकाकीपण दिग्दर्शकाने उत्तमरीत्या टिपले आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू हा सिनेमा बघून खूप भारावून गेले होते त्यातील सामाजिक आशय त्याना खूप आवडला होता . त्यांनी दिग्दर्शक बिमल रॉय यांना खास पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी