
Bigg Boss Marathi 6: ‘इथे सगळे स्वतःला चोर बनवण्यासाठी आले आहेत का?’ रितेशने प्रभूला चांगलचं झापलं …
‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi 6) च्या घरात दररोज नवे वाद, नवी समीकरणे आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आठवडाभरात घडलेल्या घटनांचा हिशोब मांडण्यासाठी होणारा ‘भाऊचा धक्का’ हा भाग नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या भागात मात्र वातावरण विशेष तापलेले पाहायला मिळाले. घरातील काही घडामोडींमुळे रितेश भाऊंचा राग अनावर झाला आणि त्यांनी प्रभूला थेट सवाल विचारत त्याच्या गेम स्ट्रॅटेजीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या आठवड्यातील एका घटनेमुळे घरात बरीच चर्चा रंगली होती. काही सदस्यांच्या वस्तू गायब झाल्याचा मुद्दा पुढे आला आणि त्यावरून घरात तणाव निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर ‘भाऊच्या धक्क्यावर’ रितेशने प्रभूला जाब विचारला. संताप व्यक्त करत तो म्हणाला, “वस्तू सगळ्यांच्या जवळ लपवून ठेवून त्यांना चोर सिद्ध करणे हा तुमचा गेम आहे का? ही तुमची गेम स्ट्रॅटेजी आहे का?” (Bigg Boss Marathi 6)

रितेशने पुढे आणखी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत सांगितले की, “इथे आलेली सगळी मंडळी बाहेर मोठं नाव कमावून आली आहेत. ती इथे स्वतःला चोर म्हणून ओळख मिळवण्यासाठी आली आहेत का?” रितेशचा हा रुद्रावतार पाहून घरातील सदस्यही काही काळ शांत बसलेले दिसले. प्रभूचा चेहराही त्या वेळी गंभीर दिसत होता आणि त्याला लगेच उत्तर देणं कठीण गेल्याचं दिसून आलं. दरम्यान, यापूर्वी एका एपिसोडमध्ये राखीने प्रभूला इतर सदस्यांच्या वस्तू लपवण्याचा सल्ला दिल्याची चर्चा होती. त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरूनच हा मुद्दा ‘भाऊंच्या धक्क्यावर’ पुन्हा उफाळून आला.

या घटनेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच प्रेक्षकांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या. काही प्रेक्षकांच्या मते, प्रभू सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला बिचारा दाखवत आहे. एका प्रेक्षकाने लिहिले की, “प्रभूला सहानुभूतीवर मतं मिळत आहेत.” तर दुसऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, “तन्वी सोबत राहणं प्रभूला एकेदिवशी महागात पडणार आहे.” याउलट प्रभूच्या समर्थकांचे म्हणणे आहे की घरातील इतर सदस्य त्याचा फक्त वापर करून घेत आहेत.(Bigg Boss Marathi 6)
==============================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 घरातलं धक्कादायक एलिमिनेशन; ‘या’ स्पर्धकाने घेतला निरोप!
==============================
दरम्यान, काल म्हणजेच रविवारच्या भागात घरात आणखी एक मोठा निर्णय झाला. रविवारी होणाऱ्या एलिमिनेशनकडे सर्वांचे लक्ष लागले होतो. गेल्या आठवड्यात रुचिता जामदार (Ruchita Jamdar) घराबाहेर पडली होती. आणि यावेळी प्राजक्ता शुक्रे (Prajakta Shikre) घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि तेच झाल.त्यामुळे बाल्कनी ग्रुपमधील सागर कारंडे हा एकमेव सदस्य घरात आता उरला आहे. एकूणच, या आठवड्यातील ‘भाऊचा धक्का’ रितेशच्या कठोर भूमिकेमुळे आणि प्रभूवरील टीकेमुळे विशेष चर्चेत आला आहे. पुढील भागांमध्ये या वादाचा घरातील समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.