
Guru Dutt : जेव्हा मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशावरून ‘हे’ गाणे सिनेमातून वगळण्यात आले!
भारतीय सिनेमातील सेंसॉर बोर्ड ही संस्था सुरुवातीपासूनच एक वादग्रस्त ठरली आहे. आज बदलत्या काळानुसार सेन्सॉर बऱ्यापैकी लिबरल झाले आहे पण साठ सत्तर वर्षांपूर्वी मात्र असे चित्र नव्हते. अक्षरशः अगदी हास्यास्पद वाटेल अशा गोष्टींसाठी काही सीन्स आणि गाणी त्या काळात कट केली जात होती. आज इतक्या वर्षानंतर जेव्हा या गोष्टी आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा गंमत वाटते. त्या काळातील एका डिलीटेड सॉन्गचा हा किस्सा! लेखक माणिक प्रेमचंद यांनी लिहिलेल्या मजरूह सुलतानपुरी यांच्यावरील पुस्तकात हा किस्सा विस्ताराने लिहिलेला आहे.
गुरुदत्त फिल्म्सचा ‘सी.आय.डी’ हा चित्रपट 2 नोव्हेंबर 1956 या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज खोसला यांनी केला होते. या चित्रपटात देव आनंद, शकीला आणि वहिदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिली होती तर संगीत ओ पी नय्यर यांचे होते. या चित्रपटातील एक गाणे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशामुळे सिनेमातून बाद करावे लागले होते.

त्या काळात 1955 साली आजचा महाराष्ट्र हा बॉम्बे स्टेट म्हणून ओळखला जायचा. या बॉम्बे स्टेटचे तत्कालीन मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. हे मुख्यमंत्री अतिशय डिसिप्लिनड आणि करड्या शिस्तीचे म्हणून ओळखले जायचे. त्यांना वात्रटपणा,अश्लीलता अजिबात आवडायची नाही. ‘सी आय डी’ चित्रपट हा तयार झाला होता आणि सेन्सॉर बोर्डाकडे परीक्षणासाठी पाठवला होता. आपला सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडून पास व्हायला काहीच हरकत नाही असे सर्वांना वाटत होते. सिनेमाच्या रिलीज ची तयारी चालू झाली. त्याच काळात मुख्यमंत्री यांच्या ऑफिस कडून एक समन्स गुरुदत्त फिल्म्सला पाठवण्यात आले. त्यात मुख्यमंत्र्यांनी आपल्या ऑफिसमध्ये बोलावले होते.
================================
हे देखील वाचा : Dhurandhar : The Revenge : रणवीरने त्याच्याच चित्रपटाचा मोडला रेकॉर्ड!
================================
आता सरकारी दरबारी बोलावणे म्हटल्या वर त्या पद्धतीने निर्माता गुरुदत्त दिग्दर्शक राज खोसला, अभिनेता देव आनंद, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार ओपी नय्यर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की आपल्याला इथे नेमकं कशासाठी बनवले आहे. पण नक्कीच चित्रपटाच्या संदर्भात आहे. अभिनेता देव आनंद त्या काळात टॉपचा अभिनेता होता त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले होते. मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर सुरुवातीच्या जुजबी चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सी आय डी या चित्रपटातील ‘जाता कहा है दिवाने सब कुछ यहां है सनम ..’ या गीता दत्तने गायलेल्या गाण्याचा उल्लेख केला आणि या गाण्यांमध्ये ‘फी फी’ हा शब्द कशासाठी वापरला? असे गीतकार मजरूह सुलतानपूरी यांना विचारलं.
गीतकाराने सांगितले की,” या शब्दाचा तसा काहीही अर्थ नाही. फक्त मीटरमध्ये बसावा म्हणून मी हा शब्द वापरला आहे.” त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ”परंतु आम्हाला या अर्थहीन शब्दातून अश्लीलता दिसते आहे. त्यामुळे हे गाणे आम्ही पास करू शकत नाही!” मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेल्या सेन्सॉर बोर्डातील सदस्यांनी देखील शिक्का मोर्तब केले! निर्माता गीतकार सर्वांनी हर तऱ्हेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी आणि अधिकारी काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने हे गाणे चित्रपटातून वगळण्याचा निर्णय झाला!

हे गाणे चित्रपटातून जरी डिलीट केले असले तरी त्याच्या रेकॉर्ड्स ऑलरेडी मार्केटमध्ये आल्या होत्या आणि हे गाणे सीआयडी चित्रपटातील इतर गाण्यांच्या इतकेच किंबहुना त्याहून जास्त लोकप्रिय ठरले होते. प्रेक्षक जेव्हा चित्रपट पाहायला गेले तेव्हा हे गाणे न दिसल्यामुळे त्यांनी थोडासा आरडा ओरडा देखील केला होता. परंतु नंतर निर्मात्याने वर्तमानपत्रातून एक निवेदन देऊन हे गाणे चित्रपटातून वगळण्यात आले आहे असे सांगितले. पुढे बऱ्याच वर्षांनी जेव्हा या सिनेमाच्या सीडी मार्केटमध्ये आल्या तेव्हा हे गाणे त्यात घेतले होते. ‘बॉम्बे वेल्वेट’ या 2015 साली आलेल्या रणवीर कपूर आणि अनुष्का शर्मा च्या सिनेमात हे गाणे रि क्रिएट केले होते!
================================
हे देखील वाचा : धर्मेंद्रने गुरुदत्तच्या उपकाराची जाणीव कशी ठेवली?
================================
हा सिनेमा 1956 सालच्या टॉप टेन चित्रपटातील होता. गुरुदत्त आणि देव आनंद हे दोघे स्ट्रगल पिरेड मध्ये पुण्यात एकमेकांचे मित्र होते. दोघांनी त्याच वेळी एक अलिखित करार केला होता . तो असा होता की ज्या वेळेला देव आनंद आपल्या संस्थेचा चित्रपट निर्माण करेल तेंव्हा त्याचे दिग्दर्शन गुरुदत्त करेल (त्या प्रमाणे ‘बाजी’ (1951) चे दिग्दर्शन गुरु दत्त ने केले.) आणि जेंव्हा गुरुदत्त आपल्या बॅनर चा सिनेमा बनवेल तेंव्हा त्याचा नायक देव आनंद असेल! (त्या पध्दतीने सी आय डी चा नायक देव बनला!)
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी